मुंबई : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये व्यापक स्वरूपात ‘टीबी मुक्त भारत’ अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केली. लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या भागांमध्ये क्षयरोगाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याचा आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका, रेड क्रॉस सोसायटी तसेच विविध विद्यापीठांच्या सहकार्याने ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र शाखेची बैठक तसेच राज्यातील तीन विद्यापीठांच्या कुलगुरूंची स्वतंत्र बैठक पार पडली. त्यावेळी राज्यपालांनी या अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. कुर्ल्यासह मुंबईतील विविध झोपडपट्टी भागांमध्ये क्षयरोग तपासणी, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार देशभरात ‘टीबी मुक्त भारत’ अभियान राबविले जात असले तरी महानगरांतील झोपडपट्ट्यांमध्ये अधिक प्रभावी उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.
क्षयरोगाचे निदान वेळेत झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याने आरोग्य विभाग आणि पालिकेमार्फत विशेष तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेकडून टीबी संदर्भातील माहिती, शिक्षण आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जातील. या उपक्रमात एनसीसी, स्काऊट-गाईड, रोटरी क्लब तसेच युवा रेड क्रॉस स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. क्षयरुग्णांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना राज्यपालांनी दिल्या. रेड क्रॉस सोसायटीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपले कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये कामकाज थांबले आहे तेथे नव्याने उपक्रम सुरू करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यांना लोक भवनातर्फे गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कृत्रिम प्रज्ञा (AI) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने क्षयरोगाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या झोपडपट्ट्या शोधण्याच्या कार्यात विद्यापीठांनी सहकार्य करावे, अशी सूचनाही राज्यपालांनी केली. बैठकीला रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेचे उपाध्यक्ष सुरेश देवरा यांच्यासह पदाधिकारी तसेच मुंबई, ‘बाटू’ आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.







