मुंबई : राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त लोकभवन, मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या वेळी मुंबई अग्निशमन दल, एमआयडीसी तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय व धाडसी सेवेसाठी राष्ट्रपती पदकांनी सन्मानित करण्यात आले. वाढते नागरीकरण, उंच इमारती, भुयारी मेट्रो प्रकल्प, तसेच झपाट्याने वाढणारे औद्योगिक क्षेत्र यामुळे आपत्कालीन परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत चालली असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. मोठ्या प्रमाणावर उभारल्या जाणाऱ्या गोदामे, डेटा सेंटर्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित सुविधा यामुळे आग लागण्याच्या घटनांचे स्वरूप बदलत असून, अशा नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अग्निशमन दल अधिक सज्ज राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राज्यपालांनी पुढे सांगितले की, अग्निशमन सेवा ही केवळ आग विझविण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून सार्वजनिक ठिकाणे, औद्योगिक संपत्ती आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ती पार पाडत आहे. अलीकडील काळात गॅस गळती, रासायनिक आगी तसेच ई-वाहने आणि विविध विद्युत उपकरणांमधील लिथियम-आयन बॅटरीमुळे होणाऱ्या आगींच्या घटना वाढल्या असून, या पार्श्वभूमीवर आग प्रतिबंध, शोध व विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या परिस्थितीनुसार अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सातत्याने प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि अद्ययावत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात अग्निशमन सेवांच्या आधुनिकीकरणासाठी १५व्या वित्त आयोगांतर्गत ६१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीमुळे शहरी तसेच ग्रामीण भागात प्रभावी आणि सक्षम अग्निसुरक्षा सेवा पुरविणे शक्य होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. तसेच राज्यात अग्निविज्ञान क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र संस्था उभारणे किंवा विद्यमान संस्थांचे बळकटीकरण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून आग नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा शोध, पर्यावरणपूरक अग्निशामक साधनांचा विकास आणि विविध आस्थापनांचे सर्वंकष अग्निसुरक्षा ऑडिट करण्यावर भर दिला जावा, असेही त्यांनी सुचवले. याशिवाय, विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांनी अग्निसुरक्षा सराव, जनजागृती मोहिमा आणि आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.







