मुंबई : मुंबई शहराला सांभाळण्यास जड झालेले, नको असलेले किंवा स्थलांतर करायचे प्रकल्प मुलुंडमध्ये ढकलण्याचा प्रशासकीय शिरस्ता कायम असून आधी प्रकल्पबाधितांसाठीची घरे मग धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांसाठी घरे, मग नवीन कबुतरखाना आणि आता भटक्या श्वानांसाठी निवारे यासाठी मुलुंड पूर्व परिसरातील जागाच निवडण्यात आल्या आहेत.
युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांनी भटक्या कुत्र्यांवर सुरू असलेल्या कारवाई विरोधात आज शिवाजी पार्क मैदानात आंदोलन केले. यावेळी बेघर नव्हे, ते आमचेच आहेत, अशी घोषणाबाजी करण्यात आली. प्राण्यांसाठी काम करणार्या विविध संघटनाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. झीनत शबरीन म्हणाल्या की, भटक्या कुत्र्यांबाबत न्यायालयाने दिलेले आपले आदेश तत्काळ मागे घ्यावेत आणि कबुतर खाण्यांप्रमाणेच मुंबईत ही बेघर कुत्र्यांसाठी सरकारने व्यवस्था करावी. राहुल गांधी जेव्हा जेव्हा लोकांच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेतात, त्यानंतर न्यायालयाकडून असे आदेश दिले जातात. त्या पुढे म्हणाल्या की, न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईत भटक्या कुत्र्यांवर अमानुष कारवाई सुरू आहे. मात्र, भटक्या कुत्र्यांना मुंबई बाहेर टाकताना त्यांच्यासाठी निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था नाही. तेव्हा सरकारने याचे राजकारण न करता कुत्र्यांसाठी लसीकरण आणि निवारा या गोष्टींवर लक्ष द्यावे. कुत्र्यांचे स्थलांतर थांबवावे. प्रियंका आणि राहुल गांधी यांनी भटक्या कुत्र्यांसाठी न्यायालयीन लढा दिला होता.







