मुंबई : खोटे दागिने विक्रीच्या व्यवसायात गुंतवणुकीवर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २८ जणांची दोन कोटींना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जोगेश्वरीतील व्यापारी निपुल खिमजी भाई संघवी (४४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, ७ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान ही फसवणूक झाली आहे. यादरम्यान आरोपी हसमुख भाटी याने तक्रारदार यांच्यासह २८ जणांना खोटे दागिने विक्रीच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास १० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, नागरिकांनी एकूण पाच कोटींची गुंतवणूक केली. अखेर, तक्रारदार यांनी गुंतवणुकीची रक्कम परत करण्यासाठी विचारणा केली. त्यावेळी आरोपीने तीन कोटी परत केले. पण उर्वरित दोन कोटी देण्यास टाळाटाळ सुरु झाल्याने अखेर तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी हसमुख भाटी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.





