मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलत काही खासदारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांना तातडीचा संदेश पाठवून या खासदारांना आवश्यक ती वाढीव सुरक्षा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. सुरक्षा प्रदान करण्यात आलेल्या खासदारांमध्ये संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. गुप्तवार्ता विभागाच्या निर्देशानुसार, संबंधित पोलीस यंत्रणांनी स्थानिक परिस्थिती, उपलब्ध माहिती आणि संभाव्य धोक्याचे मूल्यमापन करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात. या खासदारांच्या दौऱ्यांदरम्यान विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच जिल्हा आणि आयुक्तालय स्तरावरील सुरक्षा समित्यांच्या पुढील बैठकीत त्यांच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेऊन ती कायम ठेवणे, वाढवणे अथवा कमी करणे याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत संभाव्य बंडखोरीच्या चर्चांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला होता. तसेच पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. याशिवाय संबंधित खासदारांना सुरक्षा आणि इतर सुविधा पुरविल्या जातील, अशी टीकाही त्यांनी केली होती. विशेष म्हणजे या वक्तव्यांनंतर काही तासांतच संबंधित सहा खासदारांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा मंजूर झाल्याची माहिती समोर आल्याने विविध राजकीय चर्चांना अधिक चालना मिळाली आहे. ‘वाय प्लस’ सुरक्षा व्यवस्थेमध्ये सशस्त्र सुरक्षा कर्मचारी, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि चोवीस तास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. संबंधित व्यक्तीला असलेल्या संभाव्य धोक्याच्या आकलनानुसार सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाते. त्यामुळे या निर्णयाकडे राज्यातील राजकीय परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.







