मुंबई : महाराष्ट्रात अन्न भेसळ आणि नियमबाह्य कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून सुरू असलेल्या धडक कारवायांची सध्या राज्यभर चर्चा आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढें यांच्या नेतृत्वाखाली भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून, त्यांच्या शिस्तप्रिय आणि नियमाधिष्ठित कार्यपद्धतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अन्न सुरक्षा, नियमांचे पालन आणि जनतेच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळेतील २९ कर्मचाऱ्यांनी कामाच्या पद्धतीबाबत तक्रार केल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत संबंधित कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळा ही सामान्य सरकारी कार्यालय नसून ती जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेचे कामकाज २४ तास सुरू ठेवणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या निश्चित कार्यालयीन वेळेनुसार काम करण्याची मागणी स्वीकारता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तुकाराम मुंडे यांनी सांगितले की, प्रयोगशाळेचे काम शिफ्ट पद्धतीने चालते आणि याचा अर्थ कर्मचाऱ्यांना २४ तास काम करावे लागते असा नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याची ड्युटी शिफ्टनुसार असते आणि आठवड्याला ४८ तासांपेक्षा अधिक काम कोणाकडूनही करून घेतले जात नाही. तसेच नियमानुसार साप्ताहिक सुट्टीही दिली जाते. सध्या प्रयोगशाळेत दोन शिफ्टमध्ये सहा दिवस काम सुरू असून, गरज भासल्यास जनतेच्या हितासाठी २४ तास सेवा सुरू ठेवावी लागू शकते, असे त्यांनी नमूद केले. कर्मचाऱ्यांमध्ये काही गैरसमज निर्माण झाला असेल, तर तो दूर करण्यात येईल आणि सध्या संबंधित प्रयोगशाळेत कामकाज सुरळीत सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी सरकारी सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या नियमांनुसार आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. “ज्यांना शासनाच्या नियमानुसार काम करायचे नसेल, त्यांनी राजीनामा देऊन निघून जावे,” असा स्पष्ट इशारा तुकाराम मुंडे यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे एफडीए विभागातील कामकाज, शिस्त आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित सेवांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.





