मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाने लोकल, वातानुकूलित लोकल, लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यामधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड सुरू केली आहे. पश्चिम रेल्वेवर एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात सुमारे २५ लाख विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली असून त्यांच्याकडून १५७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.
लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्याने तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून प्रत्येक स्थानकात दररोज तिकीट तपासणी करण्यात येत आहे. तसेच अनेक मोहिमा राबवून विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात येत आहे. या मोहिमेत सुमारे २५ लाख विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. फेब्रुवारी २०२४ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करून १५.६२ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. याच कालावधीत पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात एक लाख दोन हजार विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून सुमारे ४.५५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५६ हजार ४०० प्रवाशांवर कारवाई करून १.८८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्यावर्षीच्या तुलनेत या दंड वसुलीत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.




