मुंबई : आम आदमी पार्टी (आप) मुंबईने महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला सर्वसमावेशक जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केला आहे. दिल्ली आणि पंजाबमधील यशस्वी प्रशासन प्रारूपावर (मॉडेलवर) आधारित पाणी, शिक्षण, वीज आणि दवाखाना या चार गोष्टी मुंबईकरांना मोफत देण्याचे आश्वासन ‘केजरीवालची गॅरंटी’ या बॅनरखाली ‘आप’ने आपल्या जाहिरनाम्यामध्ये दिले आहे. दिल्लीच्या ‘आप’च्या माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते आपच्या या जाहिरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आतिशी म्हणाल्या की, ‘अफाट संपत्ती असूनही मुंबई शहरीकरण एक विद्रूप, अस्वच्छ आणि असुरक्षित बनले आहे. जर योग्य नियोजन केले, तर मुंबई जगासाठी एक आदर्श बनू शकते. ७५ हजार कोटी रुपयांहून अधिक अर्थसंकल्प असलेल्या या पालिकेने आजपर्यंत केवळ निकृष्ट सेवा दिल्या आहेत. बांधकाम क्षेत्रातील नफा लाटण्यासाठी पालिकेच्या शाळा जाणीवपूर्वक बंद केल्या जात आहेत. मुंबईत प्राथमिक आरोग्य सेवा अस्तित्वातच नाही. आम्ही दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच मुंबईत जागतिक दर्जाचे मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सेवा आणि मोफत वीज देऊ. आमचा जाहीरनामा हा पर्याय नसून मुंबईची प्रतिष्ठा आणि क्षमता पुनर्संचयित करण्याची ठोस योजना आहे.
- मोफत आणि २४ तास पाणी :
प्रत्येक घराला दरमहा २०,००० लिटरपर्यंत मोफत नळ पाणी आणि २४ तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची हमी. गळती नियंत्रण योजना आणि १०० टक्के सांडपाणी प्रक्रियेसह पाणीपुरवठा व्यवस्थेचा पूर्ण कायापालट.
- जागतिक दर्जाचे शिक्षण :
पालिका शाळांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांसाठी प्रति शाळा १ कोटी रुपयांची तरतूद. सर्व विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बस पास आणि प्रत्येक शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनची सुविधा.
- मोहल्ला क्लीनिक :
मोफत सल्ला, औषधे आणि चाचण्या उपलब्ध करून देण्यासाठी १००० मोहल्ला क्लीनिकची स्थापना.
- शून्य वीज देयक :
‘बेस्ट’द्वारे प्रति कुटुंब २०० युनिटपर्यंत मोफत वीज, मोफत मीटर बसवणे आणि विकेंद्रित सौर ऊर्जेवर भर.






