पुणे : परिवहन विभागाच्या निर्देशांची अंमलबजावणी होत नसल्याने शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. गेल्या दहा महिन्यात ५१७ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे साडेतीन लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बेशिस्त रिक्षा चालकांवर वारंवार कारवाई करूनही नियम पाळले जात नसल्याने आता आरटीओने रिक्षा चालकाचा वाहन परवाना (लायसन्स) तात्पुरता निलंबित किंवा थेट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरटीओ कार्यालयाती नोंदीनुसार, पुणे शहरात २०२५ अखेरपर्यंत सुमारे एक लाख २९ हजार रिक्षाचालक आहेत. रिक्षाचालकांना गणवेश आणि बिल्ला अनिवार्य आहे. महाराष्ट्र मोटर वाहन कायद्यानुसार रिक्षा किंवा वाहन चालविताना किंवा सेवा पुरवताना गणवेश आणि ओळख क्रमांक असलेला बिल्ला अनिवार्य आहे. हा बिल्ला प्रदर्शीतही झाला पाहिजे अशी तरतूद असून पांढरा किंवा खाकी रंगाचा सदरा आणि पायजमा निश्चित कऱण्यात आला आहे. यावरून रिक्षाचालक वैध आहे किंवा नाही याची खात्री होत असून प्रवासी सुरक्षितता निश्चित होते. तसेच सार्वजनिक वाहूतक सेवेत एकसमानता आणि बेशिस्तपणा वाद, विवाद टाळून नियोजन ठेवले जाते. मात्र, शहरातील अनेक रिक्षाचालकांनकडून या नियमांचे पालक केले जात नसून गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत अनेक रिक्षाचालकांमध्ये प्रवासी भाड्यावरून वादविवाद झाल्याच्या घटना आणि तक्रारी आरटीओकडे वारंवार प्राप्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरटीओने अशा बेशिस्त रिक्षाचालकांबाबत कठोर कार्यवाही करण्यासाठी दैनंदीन तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम सुरू ठेवली आहे. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंतच्या दहा महिन्यात आरटीओच्या तपासणी अधिकाऱ्यांनी ५१७ बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली. या रिक्षाचालकांना प्रति व्यक्ती ७०० रुपये दंड आकारला असून एकूण तीन लाख ६१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.







