मुंबई : प्रभादेवी येथील रेल्वे पूल शुक्रवार मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला आहे. अटल सेतू आणि वरळी सी लिंक जोडणीसाठी हा पूल पाडण्यात येणार आहे. हा पूल पाडण्यात येणार म्हणून नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच आता या पुलाच्या मध्यभागी असलेले पश्चिम रेल्वेचे तिकीट बुकिंग कार्यालय स्थलांतरीत करण्यात येणार आहे. रेल्वेकडून त्यासाठी तयारी करण्यात येत आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २-३ दिवसांत जागा निश्चिक करुन तिथे तिकीट बुकिंग कार्यलय स्थलांतरीत करण्यात येईल. एप्रिल महिन्यात पूल बंद करुन पाडण्यात येणार असल्याने तिकीट बुकिंग काउंटर आधीच दुसरीकडे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पण पुलाच्या पाडकामास विलंब झाल्याने स्थलांतर रखडले होते.
पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर असलेल्या परळ स्थानकाचे तिकीट कार्यलय आधीच स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र लवकरच पश्चिम रेल्वेवरील स्थानकाचे तिकीट बुकिंग ऑफिस स्थलांतरित केले जाईल. प्रभादेवी पूल सध्या पादचाऱ्यांसाठी सुरू असून ते मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर पोहोचतात. प्रभादेवी स्टेशनला जाण्यासाठी तसंच तिकीट काढण्यासाठी पुलाच्या मध्यभागी असलेल्या तिकीट कार्यालयाचा पर्याय प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरत होता. त्यामुळं तशीच जागा शोधण्याची सुरूवात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.







