जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे आजपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. सकाळी १० वाजता उपोषणाला सुरुवात झाली असून, त्याआधी ते गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळचे आंदोलन हे अंतिम आणि निर्णायक असल्याचा दावा जरांगे यांनी केला असून, सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस आणि अंतिम निर्णय घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे. “आता सरकारला सुट्टी नाही,” असा थेट इशारा देत त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत वैद्यकीय रजा वगळता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत. बाहेरील जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला असून अंतरवाली सराटीसह संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनासमोर आंदोलन शांततेत पार पाडणे आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखणे, असे दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करताना जरांगे यांनी मराठा तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असेही भावनिक आवाहन केले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर टीका करत, “मी जरांगेंना भाव देत नाही. सरकार आणि जरांगे यांच्यातील संघर्षाशी आमचा संबंध नाही. मात्र ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण कोणालाही देऊ नये,” अशी भूमिका मांडली. त्यांनी ईडब्ल्यूएसप्रमाणे स्वतंत्र आरक्षणाचा पर्याय स्वीकारण्याची सूचनाही केली. दुसरीकडे, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांना काही नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याचा दावा केला आणि त्यांच्या वक्तव्यांची चौकशी करून तातडीने अटक करण्याची मागणी केली. यावर प्रत्युत्तर देताना मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी उलट सदावर्ते यांनाच अटक करण्याची मागणी केली. तसेच, गरज पडल्यास मुंबईकडे मोर्चा काढण्यासाठी ‘बी प्लॅन’ तयार असल्याचा दावाही त्यांनी केला. मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ५८ लाख मराठा नोंदींना प्रमाणपत्र व वैधता देणे, मराठा-कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करणे, स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालयाची स्थापना, सारथी संस्थेच्या बंद योजना पुन्हा सुरू करणे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याची रक्कम वितरित करणे या मागण्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांनी केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य न झाल्यास थेट मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानावर जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सरकार आणि मराठा आंदोलनकर्त्यांमधील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






