ठाणे : लहान बालकांचे शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या घडणारे पहिले टप्पे म्हणजे अंगणवाड्या. मात्र याच अंगणवाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या एका अहवालानुसार ठाणे जिल्ह्यात सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या एकूण ३ हजार ५३८ अंगणवाड्यांपैकी ६०२ अंगणवाड्यांमध्ये शौचालय नसल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे पायाभूत सुविधा नसल्याने लहान बालकांसह अंगणवाडी सेविकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामीण आणि शहरी भागात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सहा वर्षांखालील मुलांचे पोषण आणि आरोग्यस्थिती सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य महिला बाल विकास विभाग विविध उपाययोजना राबवित असते. ग्रामीण आणि शहरी भागात या सर्व योजना एकाच ठिकाणाहून राबविण्यासाठी अंगणवाडी उभारण्यात आल्या आहेत. या अंगणवाडींमध्ये कार्यरत असणाऱ्या सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून बालकांना शिक्षण देण्याबरोबरच दररोज पोषण आहाराचे वाटप केले जाते. अंगणवाडी उपक्रम बालकांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या ठिकाणी ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालक या अंगणवाड्यांमध्ये येतात. बालकांना येथे पोषण आहार, प्राथमिक शिक्षण आणि सामाजिक सवलती दिल्या जातात. मात्र शौचालय नसल्यामुळे बालकांना लघवी अथवा शौचासाठी उघड्यावर किंवा जवळच्या झाडाझुडपांत जावे लागते. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात उष्णता आणि अनेक वेळा धोकादायक परिस्थितीत जावे लागल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येते. त्वचारोग, जंत संसर्ग, पोटाचे विकार यासारख्या समस्यांनी मुलांना सतत त्रास सहन करावा लागतो. विशेषतः मुलींना याचा अधिक फटका बसतो. स्वच्छता आणि सुरक्षितता या दोन्ही बाबी कमी पडत असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना अंगणवाड्यांमध्ये पाठवण्यास टाळाटाळ करतात.







