मुंबई : राज्यात होत असलेल्या मृत्यूंमध्ये सर्वात जास्त मृत्यू रस्ता अपघातांमध्ये होत आहेत. रस्ता अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. राज्य शासन १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या एक महिन्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबवित आहे. या अभियानाचा रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे नियम याबाबत जनजागृती करून अपघात कमी करण्याचा उद्देश आहे. रस्ता सुरक्षा मोहिमेत जनसहभाग वाढवून या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप आणावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी केले. रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी मार्गदर्शन करताना मंत्री श्री. भुसे बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, परीवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन – नैनुटीया, अतिरिक्त महासंचालक (वाहतूक) सुखविंदर सिंग, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) प्रविण पडवळ, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनचे नितीन डोसा उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा हा विषय शालेय अभ्यासक्रमात असणे गरजेचे असल्याचे सांगत मंत्री श्री. भुसे म्हणाले की, रस्ता सुरक्षेचे संस्कार लहान वयातच बिंबविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याचा विचार आता करावा लागेल. राज्यात होत असलेल्या अपघातांमध्ये ६० टक्के अपघात हे दुचाकीचे असतात. दुचाकी अपघात कमी करण्यासाठी हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यात यावी. अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. अपघातग्रस्ताला उपचार देण्यासाठी नागरिक पुढे येत नव्हते. मात्र आता चित्र बदलत आहे. अनेक नागरिक पुढे येवून ‘गोल्डन अवर’ मध्ये उपचार देवून अपघातग्रस्तांचे प्राण वाचवित आहेत. रस्ता सुरक्षेबाबत उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार निधीची उपलब्धता होत आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे. त्यांच्या स्तरावर जिल्हा नियोजनमधून अपघात प्रवण स्थळे दुरूस्त करणे, जनजागृती आदींसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येत आहे. परिवहन महामंडळाप्रमाणे चालकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. त्यासाठी मोहिम राबवावी. रस्ता सुरक्षा मोहिमेच्या पुढील वर्षीच्या कार्यक्रमात अपघातांचे प्रमाण यावर्षीच्या तुलनेत निश्चितच कमी होण्याची अपेक्षाही मंत्री श्री. भुसे यांनी व्यक्त केली. रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे वाहन असलेल्या इंटरसेप्टर वाहनांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी प्रधान सचिव पराग जैन – नैनुटीया उपस्थित होते. विभागाला १८७ इंटरसेप्टर वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी प्रतिनिधीक स्वरूपात ५ वाहनांना ताफ्यात दाखल करून घेण्यात आले.





