रायगड : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी झालेल्या महापूरामुळे भारतासह विविध देशांतील पर्यटकांबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अलिबाग येथील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने कैलास मानसरोवर यात्रा आणि देवदर्शनासाठी गेलेले रायगड जिल्ह्यातील ३७ नागरिक पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. नेपाळमधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे अनेक भागांतील संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली होती. त्यामुळे तिबेट-नेपाळ सीमेवर असलेल्या या यात्रेकरूंचा काही काळ संपर्क तुटल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने सातत्याने संबंधित यंत्रणांशी संपर्क ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री केली. प्रशासनाच्या माहितीनुसार हा संपूर्ण समूह तिबेटमधील सागा येथे सुरक्षित वास्तव्यास होता आणि त्यांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण झालेला नव्हता. नेपाळ प्रशासनानेही यात्रेकरूंना आवश्यक ती मदत आणि सहकार्य उपलब्ध करून दिले. रायगड जिल्हा प्रशासनाने नातेवाईकांशी सातत्याने संपर्क ठेवत नागरिकांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सर्व यात्रेकरू सुरक्षित असून त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक समन्वय सुरू असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतणारा हा समूह तिबेटमधील सागा परिसरात काही काळ अडकून पडला होता. नेपाळमधील पूरस्थितीमुळे नेहमीच्या मार्गावर अडथळे निर्माण झाल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर प्रशासनाने नेपाळ आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून यात्रेकरूंच्या सुरक्षित स्थलांतराची व्यवस्था केली. या प्रयत्नांतर्गत सर्व यात्रेकरूंना खासगी बसद्वारे सागा येथून न्यालम चेकपोस्टमार्गे काठमांडू येथे सुरक्षितपणे आणण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी हा संपूर्ण समूह काठमांडू येथे सुखरूप दाखल झाला असून, आज सकाळी विमानाने ते भारतात परतणार असल्याची माहिती नातेवाईक दिलीप शेठ यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनानेही नागरिकांच्या परतीच्या प्रवासावर लक्ष ठेवले असून ते सुरक्षितपणे रायगडमध्ये पोहोचावेत यासाठी आवश्यक समन्वय सुरू आहे. नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील ३७ यात्रेकरू सुरक्षित असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.






