मुंबई : प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक असणारी विविध कागदपत्रे, दाखले आणि प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेकदा शासकीय कार्यालये किंवा सेवा केंद्रांच्या फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे त्यांचा वेळ वाया जाण्यासोबतच शाळेतील उपस्थितीवरही परिणाम होतो. अनेक विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसाठी शाळेला दांडी मारावी लागते, परिणामी त्यांच्या शिक्षणाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सेवा केंद्रांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. राज्य सरकारने थेट ‘आपले सरकार सेवा केंद्र’ शाळांमध्ये नेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या परिसरातच आवश्यक शासकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार, केंद्र शासनाच्या सामायिक सेवा केंद्रे २.० (सीएससी २.०) योजनेअंतर्गत राज्यभर ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांचे प्रशासकीय नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे असून नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याचे काम या केंद्रांमार्फत केले जाते. लोकसंख्येच्या आधारे या केंद्रांचे वाटप करण्यात आले असून ‘आपले सरकार’ संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सुविधा दिल्या जातात.
दहावी आणि बारावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला वेग येतो. यावेळी विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अधिवास दाखला, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यांसारखी अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. ही प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सेवा केंद्रांमध्ये जावे लागते, त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दारी सेवा पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तालुका प्रशासन, ग्रामपंचायत किंवा नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत ठराविक दिवशी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या दाखल्यांचे कामकाज प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या काळात किंवा प्रमाणपत्रांच्या वाढीव मागणीच्या कालावधीत विशेष मोहीमही राबविली जाणार आहे. याशिवाय ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालक, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय ठेवून विद्यार्थ्यांना वेळेत सेवा मिळतील याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरातच आवश्यक दाखले आणि प्रमाणपत्रे मिळणार असून पालकांची धावपळ कमी होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळून प्रवेश प्रक्रियाही अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.







