मुंबई : राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या समस्येवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील ड्रग्ज माफियांचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी सरकारने ‘टीप द्या आणि बक्षीस मिळवा’ ही नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेत अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करी आणि विक्रीबाबत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी या ‘झिरो टॉलरन्स’ मोहिमेची माहिती दिली. या योजनेअंतर्गत ड्रग्जची विक्री, तस्करी किंवा छुप्या अड्ड्यांबाबत अचूक माहिती देणाऱ्या नागरिकांना सरकारकडून योग्य आर्थिक बक्षीस दिले जाणार आहे. विशेष म्हणजे माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख १०० टक्के गोपनीय ठेवली जाईल, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होणार नाही. ड्रग्जविरोधी लढा अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष अमली पदार्थविरोधी पथकांची स्थापना करण्यात येत आहे. तसेच अमली पदार्थ तस्करांशी संगनमत करणाऱ्या किंवा त्यांना मदत करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याऐवजी थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे.
राज्यातील युवकांना ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईसह राज्यातील सुमारे ३ हजार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय ड्रग्ज तस्करांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने कठोर कायदेशीर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. संघटित गुन्हेगारीविरोधातील MCOCA अंतर्गत ड्रग्ज तस्करांवर गुन्हे दाखल करण्याचे धोरण राबविले जात असून, अमली पदार्थांच्या वाहतुकीत सहभागी असलेल्या कुरिअर कंपन्यांनाही सहआरोपी करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. सभागृहात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत पोलिसांनी २५४.५३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून १,६२६ आरोपींना अटक केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा प्रमुख सूत्रधार सलीम डोला यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यातील ड्रग्जविरोधी मोहिमेला अधिक बळकटी देण्यासाठी आता सरकारने थेट जनतेलाच या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, नागरिकांच्या सहकार्याने महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.






