पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मध्यवर्ती भोजनगृहात (केंद्रीय रेफेक्टरी) निकृष्ट दर्जाचे अन्न आणि अस्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई केली आहे. तपासणीत अन्नसुरक्षेशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने भोजनगृह चालवणाऱ्या ‘श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस’चा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भोजनात झुरळे, किडे, अळ्या तसेच शिळे अन्न दिले जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येत होत्या. या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनही छेडले होते. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य उमाप यांच्या नेतृत्वाखाली भोजनालयाची अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान भोजनालयात कीटकनियंत्रणाची प्रभावी व्यवस्था नसल्याचे, परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे तसेच पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्याचे आढळून आले. याशिवाय अन्न तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल सादर करण्यात आले नसल्याचेही निदर्शनास आले. या सर्व बाबी अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यास संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत संबंधित भोजनालयाचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला. परिणामी विद्यापीठातील केंद्रीय भोजनालयाची सेवा सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
एफडीएने स्पष्ट केले आहे की, संबंधित ठेकेदाराने सर्व आवश्यक सुधारणा करून अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन केल्यानंतरच भोजनालय पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. या प्रकरणाबाबत विद्यापीठ प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांच्याकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळू शकला नाही. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आणि विविध संघटनांनी या कारवाईचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील एका वर्षात विद्यापीठातील विविध मेस आणि कॅन्टीनमधील अन्नामध्ये किडे, अळ्या, झुरळे, केस आणि इतर आरोग्यास हानिकारक घटक आढळल्याच्या ५० हून अधिक तक्रारी समोर आल्या आहेत. केंद्रीय भोजनालयातील तपासणीतही अनेक नियमभंग उघड झाल्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या मेस आणि कॅन्टीन चालकांवर नियमानुसार कठोर कारवाई झाल्यास अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि गुणवत्ता मानकांचे पालन अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे शैक्षणिक संस्थांमधील भोजनव्यवस्थेच्या दर्जाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.







