नवी दिल्ली : देशाच्या सर्वोच्च नेत्याचा लोकांशी संवाद असल्याशिवाय लोकशाही सक्षम होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनसंवाद साधून लोकशाही मजबूत केली, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणी कार्यक्रमाचे रविवारी, ३० एप्रिल रोजी शतक पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने बुधवारी आयोजित केलेल्या ‘मन की बात @१००’ या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात शाह बोलत होते. मोदींनी लोकांच्या सज्जन, सात्त्विक व सर्जनात्मक गुणांना ‘मन की बात’मधून व्यासपीठ दिले. या तीन गुणांशिवाय लोकशाही व्यवस्था यशस्वी होत नाही, असे शाह म्हणाले.
लोकशाही मजबुतीसाठी मोदींची दोन योगदाने आहेत. जातीवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे राजकारण लोकशाहीसाठी मारक ठरते. मोदींनी या तीनही प्रदूषित घटकांपासून देशाला मुक्ती दिली. मोदींनी कार्यकौशल्याचे आणि परिणामकारकतेचे राजकारण केले, असे शाह म्हणाले. ‘मन की बात’ने देशभरातील असंख्य यशस्वी प्रयोगांना लोकांपर्यंत पोहोचवले, असे शाह म्हणाले. जगभरातील अनेक मोठय़ा नेत्यांच्या भाषणांमध्येदेखील राजकीय स्वार्थ असल्याचे दिसते; पण ‘मन की बात’मधून मोदींनी कधीही राजकारण केले नाही. मोदींनी आपल्या आचार, विचार, व्यवहारांतून लोकांशी संवाद साधला. मोदींकडे असलेले संवाद साधण्याचे अचूक कौशल्य जगात अपवादात्मक दिसते, असेही शाह म्हणाले.
मोदींचा जनसंवाद महत्त्वाचा – आमिर खान,सिनेअभिनेता
देशाचा सर्वोच्च नेता (मोदी) तुमच्यासोबत संवाद साधतो, ही बाबच तुमच्यासाठी महत्त्वाची ठरते. पंतप्रधान महत्त्वाच्या विषयांची चर्चा करतात, देशाला पुढे नेणारे विचार मांडतात, विविध सल्ले देतात. जनसंवादातून देशाचे योग्य रीतीने नेतृत्व करता येऊ शकते. मोदींनी मनातील गोष्टी लोकांना सांगितल्या, देशाला पुढे नेण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगितले, त्यांना लोकांनी प्रतिसाद दिला, असे मत सिनेअभिनेता आमिर खान यांने व्यक्त केले.