वृत्तसंस्था : हार्दिक पांड्या याच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाखाली संघाची खराब कामगिरी सुरू असतानाच आता त्याच्यावर BCCI कडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात रागाच्या भरात स्टंपवरील बेल्स उडवल्यामुळे हार्दिक पांड्याला दंड ठोठावण्यात आला. IPL च्या निवेदनानुसार, हार्दिक पांड्या IPL आचारसंहितेच्या लेव्हल १ नियमांचे उल्लंघन करताना आढळला असून, त्याच्या सामना शुल्कातील १० टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे. यासोबतच त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. ही कारवाई IPL आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत करण्यात आली असून, सामन्यादरम्यान क्रिकेट साहित्य, कपडे किंवा मैदानावरील उपकरणांचा गैरवापर करण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ही घटना KKR च्या डावातील दहाव्या षटकात घडली. हार्दिक पांड्या गोलंदाजी करत असताना मनीष पांडे याने सलग दोन चौकार लगावले. त्याआधी हार्दिकने रोव्हमन पॉवेल याला बाद करण्याची संधी निर्माण केली होती. मात्र रॉबिन मिन्झ आणि दीपक चहर यांच्या गोंधळामुळे ती संधी हुकली. या घटनेनंतर हार्दिक स्पष्टपणे निराश दिसत होता. दोन चौकारांनंतर रन-अपकडे परतताना त्याने रागाच्या भरात स्टंपवरील बेल्स उडवल्या. त्याची ही कृती मैदानावरील कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आणि त्यानंतर BCCI ने तत्काळ कारवाई करत दंड जाहीर केला. या घटनेमुळे हार्दिक पांड्याच्या वर्तनावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, मुंबई इंडियन्सच्या कामगिरीसोबतच कर्णधाराच्या आक्रमक प्रतिक्रियाही चर्चेचा विषय ठरत आहेत.







