मुंबई : मित्र अडचणीत असेल तर मदत म्हणून सहज उधार पैसे देत असतो. पण, उधारीचे राहिलेले फक्त ५०० रुपये परत मागितल्याने मित्राने आपल्याच मित्राची चाकूने सपासप वार करत हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरात घडली आहे. या चाकू हल्ल्यात पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी अवघ्या एक तासात आरोपी असलेल्या दोन सख्या भावांना ताब्यात घेतले आहे. शादाब चांद मोहम्मद खान उर्फ भुरा (२१ वर्ष) आणि शानु चांद मोहम्मद खान (२२ वर्षे ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.नाजिम इफ्तेकार खान (२५ वर्ष) अस मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाजिम इफ्तेकार खान आणि आरोपी शादाब चांद मोहम्मद खान उर्फ भुरा यांची मागील सहा ते सात महिन्यापासून ओळख होती. काही दिवसांपूर्वी नाजीमचा मोबाईल आरोपीच्या हातातून पडला होता तो दुरुस्त करण्यासाठी एक हजार रुपये इतका खर्च आला तर हा खर्च आरोपी शादाबने देण्याचे कबूल केले, मात्र हजार रुपयांपैकी फक्त पाचशे रुपये आरोपीने नाजिमच्या पत्नीकडे दिले.उरलेले पाचशे रुपये मागण्यासाठी आरोपीकडे सतत तगादा लावला होता.
याच रागातून त्यांच्यात वांद्रे रेल्वे स्टेशन ब्रिजखाली धक्काबुक्की झाली. आरोपीच्या मोठ्या भावाने देखील नाजीमला मारहाण केली. त्यावेळी नाझीम तिथून निघून जात असताना शादाबने नाझीमला खाली खेचले व त्याच्या हातातील चाकूने नाझिम यांच्या छातीत भोसकले व तो चाकू त्याचा भाऊ शानु याच्याकडे दिला. या हल्ल्यात नाझीम गंभीर जखमी झाला त्यामुळे उपचारासाठी त्याला भाभा रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच नाजिमचा मृत्यू झाला.यासंदर्भात मृत नाजीमच्या पत्नीचा जबाब नोंद करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्मल नगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत पाटील, पोलीस हवालदार शेख पोलीस नाईक सोनवणे, पोलीस हवलदार पवार पोलीस नाईक वाघमारे व पोलीस शिपाई कोयंडे यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेत त्यांना एका तासाच्या आत ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. यावेळी त्यांनी हा खून केल्याचे कबूल केले. म्हणून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत.





