नवी दिल्ली : आखाती देशात वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणारा तेल आणि वायूचा पुरवठा सध्या आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार या परिस्थितीवर अत्यंत संवेदनशीलतेने आणि सतर्कतेने लक्ष ठेवून असल्याची माहिती यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. फक्त ऊर्जा, इंधन सुरक्षाच नव्हे, तर तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेलाही सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी ‘२४*७ हेल्पलाइन’ सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत पोहचवण्यासाठी सरकार अहोरात्र सज्ज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. इस्त्राइल-अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगावर होत आहे. सामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. आखाती देशातील युद्धाची परिस्थिती चिंताजनक असून याचा जगातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत गॅस टंचाईवर बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील गॅस टंचाई आणि इंधन पुरवठ्यावर भाष्य केले. इंधन टंचाईचा सामना भारत कसा करत आहे, त्याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसेदत दिले. पश्चिम आशियातील सध्याचा संघर्ष आणि याचा भारतावर आलेल्या अडचणीवर मी बोलण्यासाठी आलो आहे. आखाती देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. ३ आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीपासून हे यु्द्ध सुरू आहे. आखाती देशातील या युद्धामुळे जगातील अनेक अर्थव्यवस्था आणि लोकांवर परिाम झाला आहे. या युद्धामुळे भारतासमोरही अप्रत्यक्ष अडचणी उभ्या राहिल्या आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून तेल आयात करणे कठीण, पण सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. ज्या देशांमध्ये सध्या युद्ध सुरू आहे अथवा युद्धामुळे जे देश या प्रभावित झाले आहेत, त्या देशांसोबत भारताचे चांगले व्यापारी संबंध आहेत. ज्या भागात युद्ध सुरू आहे तो भाग जगभरातील इतर देशांसोबतच्या आपल्या व्यापारासाठीही अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. आपल्या कच्चे तेल (Crude Oil) आणि गॅसच्या गरजांचा मोठा हिस्सा याच मार्गावरून येतो. इतकेच नाही तर १ कोटी भारतीय नागरिक आखाती देशांमध्ये राहतात आणि तिथे काम करतात, त्यामुळेही हे क्षेत्र आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. युद्धाच्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक जहाजांची ये-जा सुरू आहे आणि त्यावरील भारतीय क्रू मेंबर्सची संख्याही खूप मोठी आहे. या विविध कारणांमुळे भारताच्या चिंता स्वाभाविकपणे अधिक आहेत. त्यामुळे या संकटाच्या काळात भारतीयांची सर्वोत्वपरी मदत केली जात असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची माहिती लोकसभेत दिली. युद्ध सुरू झाल्यापासून तिथल्या प्रत्येक भारतीयाला, मग ते तिथे कामासाठी गेलेले असोत किंवा पर्यटक म्हणून, त्यांना सर्वतोपरी मदत पोहोचवली जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या संकटाच्या काळात स्वतः पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील बहुतांश देशांच्या प्रमुखांशी दोनदा फोनवरून चर्चा केली आहे. त्या सर्व देशांनी तिथल्या भारतीयांच्या सुरक्षेचा पूर्ण विश्वास व्यक्त केला. युद्धजन्य परिस्थितीमुळे काही भारतीयांना दुखापत झाली आहे, तर दुर्दैवाने काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा कठीण परिस्थितीत भारतीय दूतावास (Missions) सातत्याने सतर्क असून तिथल्या लोकांसाठी वेळोवेळी मार्गदर्शक सूचना (Advisory) जारी करत आहेत. मदतीसाठी भारत आणि संबंधित देशांमध्ये २४ तास सुरू राहणारे आपत्कालीन नियंत्रण कक्ष (Outreach Room) आणि हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत, जेणेकरून बाधितांना तातडीने माहिती आणि मदत मिळू शकेल. परदेशातील भारतीयांची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे पंतप्रधानांनी म्हणाले.







