वृत्तसंस्था : टी २० विश्वचषकात टीम इंडियासाठी हुकमी एक्का असणाऱ्या रिंकू सिंह याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. रिंकू सिंग यांचे वडील खानचंद्र सिंग यांचे निधन झाले. नोएडा येथील यथार्थ रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खानचंद्र सिंग यांना यकृताचा कॅन्सर झाला होता. स्टेज-४ असल्याने त्यांची प्रकृती अधिकच बिकट झाली होती. झिम्बॉम्बेच्या सामन्याआधी रिंकू सिंग वडिलांना भेटण्यासाठी रूग्णालयात पोहचला होता. पण त्यानंतर देशासाठी तो पुन्हा टीम इंडियासोबत जोडला गेला. भारताने झिम्बॉब्वेविरोधात भारताने विजय मिळवल्याचा आनंद असतानाच रिंकू सिंग याच्यावर दुखाचा डोंगर कोसळलाय. वडिलांचे निधन झाल्याचे समजताच रिंकू सिंग चेन्नईहून तात्काळ दिल्लीसाठी रवाना झाला आहे.
रिंकू सिंगचे वडील खानचंद्र सिंग गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ते स्टेज-४ यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त होते आणि काही काळापासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वडिलांच्या प्रकृती गंभीर असल्याची बातमी मिळताच रिंकू सिंगला टीम इंडिया सोडून ताबडतोब घरी परतावे लागले होते. टी-२० विश्वचषकादरम्यान रिंकू चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सराव सत्रात सहभागी होऊ शकला नाही, तर इतर खेळाडू सराव करत होते. नंतर हे स्पष्ट झाले की त्याच्या वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला घरी परतावे लागले. पण तो तात्काळ त्याच रात्री चेन्नईत पोहचला होता. गुरूवारी रात्री महत्त्वाच्या सामन्यात रिंकू सिंग याने शानदार फिल्डिंग केली. त्याला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळाली नव्हती. पण त्याने बदली खेळाडू म्हणून मैदानात आल्यानंतर आपली चूणूक दाखवली होती.






