वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका भारताने १-० अशा फरकाने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याचा पाचवा दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला. अशा प्रकारे दुसरी कसोटी अनिर्णित घोषित करण्यात आली. मात्र, टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकल्याने ही मालिका भारताच्या नावे झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर ४३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ केवळ २५५ धावाच करू शकला. अशा स्थितीत भारताला पहिल्या डावात १८३ धावांची भक्कम आघाडी मिळाली. त्याचवेळी दुसऱ्या डावात टीम इंडियाने २ बाद १८१ धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे यजमान वेस्ट इंडिजला विजयासाठी ३६५ धावांचे मोठे लक्ष्य देण्यात आले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजवर आपली पकड घट्ट केली पण खेळाच्या चौथ्या दिवशी पावसामुळे सामना लवकर थांबवण्यात आला. यानंतर पाचव्या दिवशी सकाळपासूनच पोर्ट ऑफ स्पेनमध्ये ढगाळ वातावरण होते आणि मुसळधार पाऊस सुरू होता. टी ब्रेकपर्यंत पाऊस सुरूच होता.
शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच मुसळधार पावसाने पोर्ट ऑफ स्पेन भिजले. पहिल्या सत्रातही दोन्ही संघ मैदानावर पोहोचले नव्हते, अशी परिस्थिती होती. मात्र, रात्री १० वाजता (भारतीय वेळेनुसार) पाऊस थांबला आणि सामना १०.४५ वाजता सुरू होणार होता. खेळ सुरू होण्यापूर्वीच पुन्हा पावसाने हजेरी लावली. हा पाऊस काही काळ सुरु होता आणि त्यानंतर पुन्हा ११.१० वाजता खेळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच्या अवघ्या एक मिनिटापूर्वी पुन्हा हलका पाऊस सुरू झाला, ज्याने काही वेळातच उग्र रूप धारण केले. सुमारे तासभर अशा जोरदार पावसानंतर खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. टीम इंडियाने वेस्ट इंडिजमध्ये सलग पाचवी कसोटी मालिका आणि विंडीज संघाविरुद्धची सलग नववी मालिका जिंकली. २००२ पासून टीम इंडियाने त्यांच्याविरूध्द एकही कसोटी गमावलेली नाही. असे असूनही भारतीय संघाचे नुकसान निश्चितच झाले. सामना अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पूर्ण १२ गुण मिळाले नाही. त्यांना केवळ ४ गुणांवर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर विंडीज संघालाही ४ गुणांसह खाते उघडण्याची संधी मिळाली.