मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक वाहतूक वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’ उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतूक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी बीकेसीमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांनी मेट्रो, उपनगरीय रेल्वे आणि बससारख्या सार्वजनिक वाहतूक सुविधांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बीकेसीमध्ये दररोज कामानिमित्त येणाऱ्या सुमारे दोन लाख नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन एमएमआरडीएकडून करण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डब्ल्यूआरआय इंडियाच्या सहकार्याने या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सरकारी अधिकारी, वाहतूक संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि गतिशीलता क्षेत्रातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत झालेल्या गोलमेज परिषदेत या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती.
बीकेसी हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र मानले जाते. मात्र येथे येणाऱ्या बहुतांश नागरिकांकडून वैयक्तिक वाहने, टॅक्सी आणि रिक्षांचा वापर केला जातो. उपलब्ध माहितीनुसार केवळ २५ टक्के प्रवासी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, तर ५४ टक्के प्रवाशांना दररोज प्रवासासाठी दोन तासांहून अधिक वेळ खर्च करावा लागतो. प्रत्येक पाच प्रवाशांपैकी एकाचा प्रवास तीन तासांपेक्षा जास्त कालावधीचा असतो. मेट्रो, रेल्वे किंवा बस स्थानकांपासून अंतिम गंतव्यस्थळी पोहोचण्यासाठी पुरेसे पर्याय नसल्यामुळे अनेक नागरिक वैयक्तिक वाहनांवर अवलंबून राहतात. तरीही ८२ टक्के प्रवासी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास तयार असल्याचे समोर आले असून त्यासाठी अधिक सक्षम आणि सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने हा उपक्रम हाती घेतला असून दर शुक्रवारी अधिकाधिक नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.






