मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही आंदोलनाची ठिणगी पडली आहे. पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक, अभिजित दीपके आणि देशभरात ताब्यात घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ २४ जुलै रोजी मुंबईत शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच संसदेबाहेर आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर काही खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचाही त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. सामाजिक माध्यमांवरील पोस्टद्वारे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नसून देशातील जागरूक नागरिकांचे आहे. त्यामुळे या आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी कोणताही पक्षीय झेंडा न आणता केवळ हातात तिरंगा घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सर्व नागरिक एकत्र येऊन राष्ट्रगीत गातील आणि देशाच्या एकतेचा, लोकशाही मूल्यांचा तसेच संविधानावरील विश्वासाचा संदेश देतील, असेही त्यांनी म्हटले आहे. हा पक्षीय संघर्ष नसून देशाच्या भविष्याशी संबंधित विषय असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थी, तरुण आणि उपोषणकर्त्यांवर झालेल्या कथित कारवाईचा निषेध व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्यांवर प्रशासनाकडून होत असल्याचा आरोप असलेल्या कारवाईविरोधात हे आंदोलन आहे. तसेच संसदेबाहेर शांततापूर्ण आंदोलन करताना राहुल गांधी आणि इतर खासदारांना ताब्यात घेण्यात आल्याच्या घटनेवरही त्यांनी टीका केली. लोकप्रतिनिधींनाही आंदोलन करताना अटक होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या अधिकारांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात, असे त्यांनी नमूद केले. आंदोलनादरम्यान महिला आणि पुरुष आंदोलकांवर झाल्याचा आरोप असलेल्या कारवाईविरोधात आवाज उठविणे, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे आणि लोकशाहीत उत्तरदायित्वाची मागणी करणे हीच खरी देशभक्ती असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री आंदोलनस्थळी जाऊन अभिजित दीपके यांची भेट घेतली. त्यानंतर बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका केली. या पार्श्वभूमीवर ‘एक राष्ट्र, एक भावना’ या संकल्पनेखाली होणाऱ्या मुंबईतील आंदोलनाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, त्याचा पुढील राजकीय घडामोडींवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.






