वृत्तसंस्था : अंमली पदार्थ विरोध पथक (एएनटीएफ) आणि राजस्थान दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या दोन संस्थांनी संयुक्त कारवाईत अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी बजरंग सिंगला अटक केली. बजरंग सिंग हा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एनएसजी कमांडो होता. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान तो मुंबईतील ताज हॉटेलमध्ये केलेल्या एनएसजीच्या कारवाईत तो सहभागी झाला होता. बजरंग हा ओडिशा आणि तेलंगणा येथून गांजा आणून राजस्थानमध्ये त्याचे नेटवर्क चालवत होता. त्याच्यावर २५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
पोलीस पकडू नये यासाठी बजरंग मोबाईल फोन फार कमी प्रमाणात वापरत असे. तो एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नसे. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर राजस्थानच्या एटीएसने त्याला अटक केली. कारवाईदरम्यान त्याच्याकडून २०० किलो गांजा जप्त करण्यात आला. बजरंगचा निर्भड स्वभाव आणि ओडिशा-तेलंगणा राज्यातील संपर्कांमुळे त्याने राजस्थानमध्ये नेटवर्क तयार केले होते, अशी माहिती आयजी विकास कुमार यांनी दिली.







