मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील गॅस टँकर अपघात आणि त्यानंतर झालेली ३२ तासांची कोंडी यामुळे वाहतूक व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वायू गळतीमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती अपघातानंतर होती. पण येत्या काळात मिसिंग लिंकमुळे महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याचा दावा केला जाता आहे. मिसिंग लिंकवर कोणत्याही प्रकारची स्फोटके, ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. वाहतुकीच्या नियमानुसार अशा वाहनांना मिसिंग लिंकवर प्रवेश बंदीची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई – पुणे प्रवास अतिजलद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) अंदाजे ९४ किमीचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधला. हा महामार्ग २००२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला असून या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी पथकर मोजावा लागतो. आजघडीला हा महामार्ग राज्यातील सर्वात महत्त्वाचा आणि वर्दळीचा महामार्ग आहे. या महामार्गावरून दररोज ७५ हजार वाहने धावतात. हा महामार्ग आता वाढत्या वाहनांना सामावून घेण्यासाठी अपुरा पडू लागल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. मंगळवार सायंकाळी ५ वाजता झालेला गॅस टँकर अपघात आणि त्यानंतर झालेल्या ३२ तासांच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक-प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी मिसिंग लिंक प्रकल्पाची गरज अधोरेखित झाली आहे. मिसिंग लिंक प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल झाला असता तर ३२ तासांची वाहतूक कोंडी टळली असती अशी चर्चा सुरू आहे. मिसिंग लिंकमुळे महामार्गावरील घाटाचा प्रवास टळणार असून ६ किमीने प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. प्रवास कालावधीत ३० मिनिटे वाचणार आहेत. तर दुसरीकडे अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे प्रवास सुरक्षित होणार आहे.







