मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. कारण मुंबईत लवकरच स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल धावणार आहेत. भारतीय रेल्वेने यासाठी मोठं पाऊल उचलले आहे. गर्दीमुळे मुंबई लोकलमधून पडून आणि अपघात होऊन अनेक प्रवाशांचा नाहक बळी जातो. याच सर्वबाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल विकसित करण्याचे आदेश दिले आहेत. स्वयंचलित दरवाजे असलेल्या २ नॉन एसी लोकल तयार केल्या जात आहे. चेन्नईतील आयसीएफ कंपनीमध्ये या लोकल तयार केल्या जात आहेत.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा येथे लोकल अपघात झाला होता. लोकलमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या मुंब्रा दुर्घटनेनंतर बंद दरवाजाच्या लोकल सुरू करण्यात याव्यात यासाठी चाचपणी सुरू झाली होती. असे केल्यास मुंबई उपनगरीय रेल नेटवर्कमध्ये सुधारणा येईल. सध्या मुंबईमध्ये ३००० लोकल धावतात. त्यामध्ये एसी लोकलचा देखील समावेश आहे. आता याच नेटवर्कवर २ स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल विकसित केल्या जात आहेत. या लोकल सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित होईल. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन एसी लोकल विकसित करण्याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘राष्ट्रीय वाहतुकीसाठी ऑटोमॅटिक डोअर-क्लोजर सिस्टमने असलेल्या २ नॉन-एसी लोकल ट्रेनसेट विकसित करणार आहे. या लोकल चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरी म्हणजे आयसीएफ येथे तयार केल्या जाणार आहेत.







