नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु करण्यासाठी डिसेंबर २०२४ मुदत देण्यात आली आहे. मात्र विमानतळ उभारणीचा वेग पाहता हा प्रकल्प मुदती पूर्व मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची हवाई पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकी पूर्वी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या शिवडी न्हावा शेवा प्रकल्पाचे लोकार्पण पंत्रधानपद नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न असल्याचे या कामाला अधिक गती देण्यासाठी ही पाहणी करण्यात आल्याचे समजते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ शिवडी न्हावा सेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक युनिक प्रकल्प ठरणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या विमानतळावरून ९ कोटी प्रवासी वर्षाला प्रवास करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईला एक चांगली भेट ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई-नागपूर समृध्दी मार्गाच्या दोन टप्प्याचे शुभारंभ झाला असून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे लवकरच लोकार्पण केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दृष्टीक्षेपात आहे. मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंक पण लवकरच सुरु होणार आहे, हे सर्व प्रकल्प या सरकारच्या ११ महिने काळात होत आहे, पण महविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात हे सर्व प्रकल्प मंदावले होते अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. राज्यातील काही जिल्ह्यात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उदात्तीकरण केले जात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे चालणार नाही, हे उदात्तीकरण खपून घेतले जाणार नाही, विरोधी पक्ष नेते आणि विशिष्ट समाज एका भाषेत बोलत असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.





