डोंबिवली : भटक्या श्वानांचा उपद्रव वाढत असताना पालिका आरोग्य विभागाकडून या श्वानांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. मंगळवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान मोठागाव रेतीबंदर भागातील एका घरातील बालक खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. हे बालक रस्त्यावर येताच त्याच्या बाजुला काही अंतरावर पाच भटके श्वान उभे होते. हे भटके श्वान आपणास काही करणार नाहीत या विचाराने बालक आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत आले. त्यावेळी एका श्वानाने बालकाच्या दिशेने धाव घेऊन त्याच्या पायाला चावे घेण्यास सुरूवात केली. बालक जमिनीवर कोसळले. इतर चार भटके श्वान बालकाच्या दिशेने धाऊन आले. त्यांंनी जमिनीवर पडलेल्या बालकाच्या पायाला, हाताच्या भागाला चावे घेऊन त्याच्या विजारीला पकडून तोंडाने दोन ते तीन ठिकाणी फरफटत नेले.
बालक बचावासाठी ओरडा करत होते. तेथून जात असलेल्या एका पादचाऱ्याचा हा प्रकार निदर्शनास आला. त्याने तात्काळ जमिनीवर श्वानांच्या विळख्यात पडलेल्या बालकाच्या दिशेने धाव घेतली. श्वानांच्या दिशेने रस्त्यावरील दगडी फेकल्या, तेव्हा श्वान पळून गेले. तोपर्यंत बालक गंभीर जखमी झाला होता. त्याला उभे राहता येत नव्हते. या भागातील बेबीबाई निवासमधील रहिवासी अनिकेत शरद गायकवाड यांच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे. भटक्या श्वानांच्या या वाढत्या उपद्रवाचा पालिकेने बंदोबस्त करावा म्हणून याप्रकरणी पालिकेत रहिवाशांनी तक्रार केली आहे.”या श्वानांचा उपद्रव वाढत असताना पालिका आरोग्य विभागाकडून या श्वानांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.





