मुंबई : एकेकाळी मुंबईची ओळख मानले जाणारे डबेवाले आता अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. तब्बल १३६ वर्षांची परंपरा लाभलेल्या या व्यवसायावर करोना काळानंतर मोठे संकट ओढवले आहे. घरून काम करण्याच्या वाढलेल्या पद्धतीमुळे कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली, तर ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्सच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांचा प्रतिसादही घटला आहे. परिणामी, डबेवाल्यांचा पारंपरिक व्यवसाय डबघाईला आला असून सध्या मुंबईत केवळ एक हजार ते १२०० डबेवाले कार्यरत असल्याचे चित्र आहे. मुंबईतील बहुतांश डबेवाले पुणे जिल्ह्यातील मुळशी, खेड, मावळ, आंबेगाव आणि जुन्नर भागातील असून ते अनेक वर्षांपासून मुंबईकरांना घरचे जेवण कार्यालयात पोहोचवण्याचे काम करत आहेत. मात्र, २०२० ते २०२३ या काळात करोना महामारीमुळे व्यवसाय जवळपास बंदच होता. त्यानंतर पुन्हा काम सुरू झाले असले तरी पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय अनेक कॉन्व्हेंट शाळांनी बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करून स्वतःची उपहारगृहे सुरू केल्याने विद्यार्थ्यांचे डबे पोहोचवण्याचे कामही बंद झाले.
बदलती जीवनशैली आणि Swiggy तसेच Zomato यांसारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांमुळे डबेवाल्यांचा व्यवसाय आणखी अडचणीत सापडला आहे. या व्यवसायातून महिन्याला साधारण १८ ते २० हजार रुपये मिळत असल्याने कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण होत आहे. त्यामुळे अनेक डबेवाल्यांनी चहा आणि भाजीपाला विक्री, माळीकाम, कापड व्यवसाय तसेच रिक्षा चालविणे असे जोडधंदे सुरू केले आहेत. डबेवाले दररोज सकाळी ग्राहकांच्या घरातून डबे गोळा करून रेल्वे स्थानकांमार्फत विविध सांकेतिक चिन्हे आणि आकड्यांच्या मदतीने ते कार्यालयांमध्ये पोहोचवतात आणि संध्याकाळी पुन्हा घरी आणून देतात. या संपूर्ण प्रक्रियेसाठी त्यांचा पूर्ण दिवस जातो. काही संस्थांकडून ई-बाईकची सुविधा देण्यात आली असली तरी वाहनतळ आणि चार्जिंगची योग्य व्यवस्था नसल्याने नव्या अडचणी निर्माण होत असल्याचे डबेवाल्यांनी सांगितले. नव्या पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरवल्याने डबेवाल्यांची ही शेवटची पिढी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.







