मुंबई : दिवाळी सूरू व्हायला आता बोटावर मोजण्या इतके दिवस उरले आहेत. त्यामुळे बाजारात दिवाळीची लगबग आहे आणि एक वेगळाच उत्साह आहे. दिवाळीला अनेक कर्मचारी बोनसची वाट पाहत असतात. पण हा बोनस मिळण्याआधीच काही सर्वसामान्य नागरीकांची लॉटरी लागली आहे. कारण या सर्व सामान्य नागरीकांची आता ३.८७ कोटी इतकी मोठी रक्कम पोलिसांनी परत केली आहे. खरं तर मुंबई पोलिसांनी सर्वसामान्य नागरीकांना दिवाळीच आधीच मोठी भेट दिली आहे.पोलीस ठाण्यात तक्रार करणाऱ्या तक्रारदारांना मुंबई पोलिसांनी ३.८७ कोटी रक्कमेच्या मौल्यवान वस्तू परत केल्या आहेत. या वस्तुंमध्ये चोरी केलेले स्मार्टफोन, रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्याचा समावेश होता.तक्रारदारांच्या या वस्तु २०२५ या सालात चोरीला गेलेल्या होत्या.याच वस्तु आता पोलिसांनी सर्वसामान्यांना परत केल्या आहेत.त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी गोड झाली आहे.
मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात २०२५ या वर्षात अनेक तक्रारदारांनी चोरीच्या घटनांची तक्रार दाखल केली होती. या तक्रारदारांना आता दिवाळीच्या तोंडावर मुंबई पोलिसांनी चोरी झालेल्या वस्तु परत करून त्यांची दिवाळी गोड केली आहे.मुंबईच्या झोन १२ मधील दहिसर, कस्तुरबा मार्ग, समता नगर, कुरार, दिंडोशी, वनराई आणि आरे या सात पोलिस ठाण्यात सर्वसामान्यांनी तक्रार दाखल केल्या होत्या. या तक्रारीनंतर पोलिसांनी ३.८७ कोटी किमतीची मालमत्ता जप्त करून ती परत केली आहे. पोलिसांनी परत केलेल्या या वस्तुंमध्ये २२५ तोळे सोन्याचे दागिने, २ बस, ७ ऑटोरिक्षा, १३ दुचाकी, ४ लॅपटॉप आणि ६८९ मोबाईल फोन यांचा समावेश आहे. या सर्व मौल्यवान वस्तू उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शशी कुमार मीणा यांनी तक्रारदारांना परत केल्या आहेत. याप्रसंगी परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजी शिंदे, कैलाश बर्वे, विजय भिसे आणि ७ पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.






