मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी किंवा कमी अंतराचा मार्ग निवडण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचा धोका पत्करतात. मात्र, अशा बेजबाबदार प्रकारांमुळे अपघातांची संख्या वाढत असून वाहतुकीवरही विपरीत परिणाम होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी चालू वर्षात कारवाईची व्याप्ती वाढवली आहे. जानेवारी ते जून २०२६ या पहिल्या सहा महिन्यांत विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ११ हजार ५७९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही संख्या जवळपास गेल्या संपूर्ण वर्षभरात झालेल्या कारवाईइतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमध्ये एकदिशा मार्गावर नियमांचे उल्लंघन करणारे, ‘नो एंट्री’मध्ये प्रवेश करणारे तसेच मुख्य मार्गांवर विरुद्ध दिशेने वाहन चालवणारे चालक यांचा समावेश आहे. संबंधित वाहनचालकांना ई-चलानद्वारे दंड आकारण्यात आला आहे. शहरात वाहनांची वाढती संख्या आणि विविध विकासकामांमुळे आधीच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांमुळे परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी सातत्याने विशेष मोहिमा राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.
विरुद्ध दिशेने वाहन चालविण्यामुळे अनेक गंभीर अपघात घडत असल्याची उदाहरणेही समोर आली आहेत. मे महिन्यात भांडुप येथे विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनाच्या धडकेत ३४ वर्षीय तरुणाच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले होते. तसेच खार परिसरात दुचाकीवरून गस्त घालत असलेल्या एका पोलिसाला विरुद्ध दिशेने आलेल्या मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याने तो जखमी झाला होता. अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या चालकांविरुद्ध केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे, तर गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत. चालू वर्षात जूनअखेरपर्यंत अशा जवळपास एक हजार वाहनचालकांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यापैकी सुमारे ५०० गुन्हे पश्चिम उपनगरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी असून, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे केवळ स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्या जीवासाठीही धोकादायक ठरते. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.





