नवी मुंबई : नवी मुंबईच्या रहिवाशांसाठी एक अत्यंत चांगली बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेली नेरुळ–मुंबई (भाऊचा धक्का) फेरी सेवा अखेर १५ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे सिडकोने विकसित केलेल्या नेरुळ पॅसेंजर वॉटर टर्मिनलला पूर्णपणे वापरात आणण्याची संधी मिळणार आहे. या नवीन प्रवासी फेरी सेवेमुळे नेरुळ ते भाऊचा धक्का (मुंबई) हा प्रवास आता खूप कमी वेळेत पूर्ण करता येणार आहे.
- सध्याचा वेळ (रस्ते मार्ग) : सुमारे ९० मिनिटे
- फेरीद्वारे प्रवासाचा वेळ : केवळ ३० मिनिटे
सुरुवातीला २०-सीटर बोट वापरून दररोज चार ट्रिप चालवल्या जातील. प्रति प्रवासी ९३५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. फेरी ऑपरेटर ‘वॉटरफ्रंट एक्सपिरियन्स मुंबई प्रायव्हेट लिमिटेड’ ने सांगितले की, नेरुळ-मुंबई मार्गावर सुरक्षा उपाय अधिक मजबूत केले आहेत. सर्व प्रवाशांना बोटमध्ये चढताना लाईफ जॅकेट घालणे अनिवार्य असेल. कंपनीने प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पर्यटन (टूरिझम) उपक्रम वाढवण्याची घोषणा केली आहे.







