नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी पुढील एका वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर राहणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला. तसेच देशासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते आणि लोकांमधील वाढत्या असंतोषामुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. देशातील परिस्थिती झपाट्याने बदलत असून सत्ताधाऱ्यांच्या नियंत्रणाखालील अनेक यंत्रणांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते, सरकारच्या आतूनच संस्थात्मक पातळीवर विरोध सुरू झाला असून विविध संस्थांमधील काही घटक स्वतंत्रपणे विचार करू लागले आहेत.
देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतही राहुल गांधी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. अर्थव्यवस्थेला संरक्षण देणाऱ्या महत्त्वाच्या यंत्रणा कमकुवत करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी भविष्यात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, असे म्हटले. “देशात अशी आर्थिक त्सुनामी येऊ शकते, जी यापूर्वी कधीच पाहिली गेली नाही,” असे त्यांनी नमूद केले. तसेच निवडणूक आयोग, गुप्तचर यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेतील काही व्यक्तींमधून असंतोष व्यक्त होत असल्याचे संदेश मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला. लोकांमधील असंतोष वाढल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली जाऊ शकतात, असे सांगत त्यांनी आणीबाणीसदृश परिस्थितीची शक्यता व्यक्त केली. दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेले हे सर्व दावे त्यांच्या राजकीय आकलनावर आधारित असून त्यासंदर्भात कोणतेही सार्वजनिक पुरावे सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांवर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते आणि पुढे या मुद्द्यावर राजकीय वाद कसा रंगतो, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.






