ठाणे : ठाणे शहरातील अत्यंत गजबजलेल्या गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळील भाजी मार्केटमध्ये आज पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्रीच्या शांततेत अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ पसरली. आगीची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दल, टीडीआरएफचे जवान आणि इतर बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, जम्बो वॉटर टँकर्स, अतिरिक्त पाण्याचे टँकर्स आणि दोन रेस्क्यू वाहने पाचारण करण्यात आली. दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्त्यांमुळे सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या, मात्र जवानांनी धाडसाने आगीच्या मुख्य केंद्रापर्यंत पोहोचून बचावकार्य सुरू ठेवले. या दुर्घटनेत ठाणे महानगरपालिकेचे स्थानक अधिकारी सागर शिंदे (वय ४३) आणि सुरक्षा रक्षक काळू शंकर गाडेकर (वय ५३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीच्या ज्वाळा आणि धुराच्या विळख्यात सापडल्याने कर्तव्य बजावत असतानाच या दोघांना वीरमरण आले.
या भीषण आगीत अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी सुजित पष्टे (वय ४५) आणि तांडेल समीर जाधव (वय ४०) यांच्यासह अन्य काही कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले. भाजी मार्केटमधील अनेक गाळे, लाकडी साहित्य आणि माल जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला, तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पहाटेच्या सुमारास संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या घटनेमुळे ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि अग्निशमन दलावर शोककळा पसरली असून, कर्तव्याशी प्रामाणिक राहणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.







