कल्याण : कल्याण बाजारपेठ परिसरात दोन जण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती कल्याण बाजारपेठ पोलिसांना मिळाली. या माहितीवरून दोन जणांना गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सापळा रचत अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक देशी कट्टा व व दोन जिवंत काडतुस जप्त केले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. या दरम्यान कल्याण बाजारपेठ पोलिसांना एपीएमसी मार्केटजवळ दोन इसम गावठी कट्टा घेऊन रिक्षातून जात असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचला. संशयित रिक्षा दिसताच रिक्षा थांबून रिक्षात बसलेल्या दोघांची झडती घेतली. या दोघांकडे देशी बनावटीचा गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी तात्काळ या दोघांना अटक केली.
विनय अय्यर आणि गणेश तिवारी अशी या दोघांची नावे आहेत. तसेच त्यांच्याकडून देशी कट्टा, काडतुस जप्त केलेत. यानंतर या दोघांविरोधात याआधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांनी हा कट्टा कुठून आणला व कशासाठी आणला होता; याचा तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.





