नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये असंतोष पसरलेला आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांचे नाव द्यावे यासाठी भूमिपुत्र आग्रही आहेत. परंतू, सरकारडून याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे भूमिपुत्रांनी येत्या २२ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा खासदार सुरेश (बाळ्या) म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येते आहे. भूमिपुत्रांच्या या मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांनी देखील पाठिंबा दिला आहे.
खासदार सुरेश (बाळ्या) म्हात्रे यांनी भूमिपुत्रांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान येत्या २२ डिसेंबरला होणाऱ्या भूमिपुत्रांच्या मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांनी आपला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच ‘हा लढा न्यायाचा आणि हक्कांचा आहे. या संपूर्ण आंदोलनाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरूच राहील,’ अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.







