मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन उभे करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारकडून सातत्याने आश्वासने दिली जात असूनही आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत त्यांनी ३० मेपासून कठोर आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. अंतरवली सराटी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. “हे केवळ उपोषण नसून अस्तित्वाची लढाई असेल,” असे सांगत त्यांनी यावेळी कोणताही मंडप न टाकता, सावलीशिवाय मे महिन्याच्या तीव्र उन्हात उघड्यावर बसून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. “इतके टोकाचे आंदोलन देशात कधी झाले नसेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे पाटील यांनी सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. आंदोलनादरम्यान उष्माघातामुळे किंवा अन्य कारणाने आपल्या जीवितास काही झाले, तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. भाजप नेते प्रसाद लाड यांनी भेट घेतल्यानंतरही आरक्षणाबाबत कोणतीही सकारात्मक हालचाल झाली नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. “मेलो तरी चालेल, पण आरक्षण मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. तसेच मराठा-कुणबी मंत्रालय स्थापनेसाठी इतका विलंब का होत आहे, पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी सदन का नाही, असे सवाल उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान समाजबांधवांनी अंतरवलीत मोठी गर्दी करू नये, असे आवाहन करत हे आंदोलन वैयक्तिक स्तरावर अधिक तीव्र करण्याचे संकेत त्यांनी दिले.







