रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे महादरवाजाजवळ दरड कोसळून पायरी मार्ग बंद झाला होता. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर काम हाती घेतले असून बहुतांश दगड-माती हटवण्यात यश आले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी हा मार्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदा २७ जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार असून राज्यभरातून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पायरी मार्ग सुरक्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. दरड कोसळल्यानंतर तातडीने यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आणि मार्गावरील अडथळे दूर करण्याचे काम सुरू करण्यात आले. गेल्या काही वर्षांत रायगडाच्या पायरी मार्गावर दरडी कोसळण्याच्या आणि दगड घसरण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने या मार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि काही सेवाभावी शिवभक्त संघटनांच्या सहकार्याने पायरी मार्गावरील धोकादायक दरडी हटवण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी अधिक व्यापक आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव दोन दिवसांसाठी पायरी मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत साफसफाई, दगड हटवणे आणि मार्गाची पाहणी यासारखी कामे करण्यात आली. प्रशासनाकडून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेतला जात असून मार्ग पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच तो शिवभक्तांसाठी खुला करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पाहणी आणि उपलब्ध माहितीनुसार, मार्गावरील बहुतांश दगड आणि माती हटवण्यात आली असून साफसफाईचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना पायरी मार्गाचा वापर करता येण्याची शक्यता वाढली आहे. मार्ग पूर्ववत सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय प्रशासनाकडून सुरक्षा तपासणीनंतर घेतला जाणार आहे. शिवभक्तांमध्येही सकारात्मक वातावरण असून सोहळ्यापूर्वी मार्ग खुला होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रायगडावर येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







