मुंबई : मुंबईजवळ दिवा-कोपर रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जणाऱ्या लोकल रेल्वेगाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात लोंबकळत होते. त्याचवेळी लखनौला जाणारी पुष्पक एक्सप्रेस लोकलच्या बाजूने जात होती. या एक्सप्रेसला घासून लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी खाली पडले असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. रेल्वेमधून प्रवासी पडल्याचं पाहून काही प्रवाशांनी आरपीएफला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर या जखमी प्रवाशांना कळव्यातील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने लोकल निघाली होती. या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. रेल्वेगाडी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आली असता, सीएसएमटीहून लखनौला जाणारी पुष्पक एक्सप्रेस समोरून आली. एक्स्प्रेसची गाडी व उपनगरीय रेल्वेगाडी बाजूने जात होत्या. मात्र लोकलच्या दरवाजात लोंबकळत उभे असलेले प्रवासी एक्सप्रेसशी घासली गेले आणि खाली पडले. एकामागून एक असे आठ प्रवासी रेल्वेगाडीतून खाली पडले. त्यापैकी पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण जखमी असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.







