मुंबई : दादरमधील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानामध्ये फटाके फोडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवाशी संघटनांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात रहिवाशी संघटनेकडून शिवाजी पार्क पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार, मुंबईत फटाके फोडण्याची अधिकृत वेळ फक्त ८ ते १० आहे, असं पत्रात नमूद केले आहे. फटाके फोडण्यासाठी जमलेल्या शेकडो लोकांमुळे दरवर्षी शिवाजी पार्कमधील रहिवासी फटाक्यांच्या ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे खूप अस्वस्थ होतात. उद्यानाच्या परिसरात आणि आजूबाजूच्या भागात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत अशी माहिती ही पत्रातून देण्यात आलेली आहे. शिवाजी पार्क मैदानावर नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर येथे मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात आले. यामुळे झालेला त्रास आणि प्रूदषण यामुळे शिवाजी पार्क आणि आजूबाजूच्या भागातील रहिवाशांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान रात्री उशिरापर्यंत फोडण्यात आले असा रहिवाशांचा दावा आहे. मैदानावर रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजातील फटाके वाजवल्याने त्रास झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिवाजी पार्क रहिवासी संघटनांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरात फटाके फोडण्याची वेळ रात्री ८ ते १० या दोन तासांपुरती मर्यादित आहे. मात्र, दीपोत्सवाच्या कार्यक्रमात या वेळेचे पालन झाले नाही. परिणामी, परिसरात ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा स्तर झपाट्याने वाढला. पार्क परिसरात अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात, त्यामुळे या प्रदूषणाचा त्यांच्यावर गंभीर परिणाम झाला असल्याचे पत्रात म्हटलं आहे. आयोजक आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे. तसंच न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जाईल अशी आशा व्यक्त केली आहे. पोलीस आदेशाचं उल्लंघन झालं का यादृष्टीने सध्या तपास करत आहेत. नागरिकांनी प्रशासनाला शिवाजी पार्क परिसराला “शांत क्षेत्र” (Silent Zone) म्हणून जाहीर करून अशा कार्यक्रमांवरील नियंत्रण अधिक कठोर करण्यात यावं अशी मागणी विविध कार्यक्रमांच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर केली आहे.







