मुंबई : दिवाळी सणामुळे बाजारात ग्राहकांची लगबग वाढली आहे. सणासाठी खरेदी करण्याची ग्राहकांची झुंबड पाहायला मिळत आहे. या सणात अनेकांचा मिठाई खरेदी करण्याचाही कल असतो. अनेक ग्राहक मोठ्या आवडीने मिठाईच्या दुकानातून कुजलेले काजू आणि सेकामेव्याची मिठाई खरेदी करत असतात. याचदरम्यान, मुंबईत अस्वच्छ पद्धतीने मिठाई बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत कुजलेले काजू आणि सुकामेव्याचा वापरकरून मिठाई बनवणाऱ्यांवर आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोलने मोठी कारवाई केली आहे. सीबी कंट्रोल आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर यंत्रणा सतर्क झाली आहे.
मुंबईच्या बोरिवलतील मां आशापुरा स्वीट्सवर सीबी कंट्रोलने धाड टाकली. सीबी कंट्रोल आणि अन्न व औषध प्रशानाच्या अस्वच्छ पद्धतीने मिठाई बनवल्या प्रकरणी कारवाई केली आहे. यावेळी तब्बल ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या विभागाकडून ३३६९ किलो काजू कतली, ११२३ काजू पावडर, ३८०९ किलो काजू, २८ किलो मिठाई आणि ५८ किलो तूप जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, बोरिवलीत कामगारांकडून अस्वच्छ पद्धतीने काजू कतली आणि सुकामेव्याची मिठाई तयार करण्यात येत होती. त्याच ठिकाणी धाड टाकून कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या गुन्हे शाखेने या कामगारांनी तयारी केलेली मिठाई जप्त केली. दिवाळीच्या तोंडावर मिठाई दुकानावर कारवाई केल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.





