मुंबई : यंदा अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे मान्सून कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचे परिणाम आतापासूनच दिसू लागले आहेत. मुंबईसह अनेक शहरांतील तलाव आणि धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाल्याने बीएमसी ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयुक्त आश्विनी भिडे यांनी १५ मेपासून शहरात १० टक्के पाणी कपात लागू करण्याची घोषणा केली आहे. सध्या भातसा आणि वैतरणा धरणांमधून अतिरिक्त पाणीसाठा मिळावा यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात येत आहे. सध्याच्या स्थितीनुसार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये एकूण सुमारे २८ टक्के, म्हणजेच अंदाजे ४.१६ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असून त्याच आधारे पुढील पुरवठा नियोजन केले जात आहे.
मुंबई शहराची एकूण दररोजची पाण्याची गरज सुमारे ४४६३ दशलक्ष लिटर इतकी असताना, सध्या जवळपास ४००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. शहराकडे कोणतेही पर्यायी जलस्रोत नसल्यामुळे संपूर्ण अवलंबित्व धरणांवरच आहे, जे केवळ पावसाळ्यात भरतात. वर्षभरासाठी सुमारे १४.४७ लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज असलेल्या मुंबईसाठी यंदा मान्सून उशिरा येण्याची शक्यता लक्षात घेऊन ऑगस्टपर्यंत पाणी साठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जर कपात लागू केली नाही, तर उपलब्ध साठा केवळ जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे १० टक्के पाणी कपात आणि राखीव साठ्याचा वापर हे दोनच पर्याय सध्या बीएमसीसमोर असून, नागरिकांनीही पाणी वापरात काटकसर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







