नवी मुंबई – पावसाळी कालावधीत आवश्यक दक्षता घेण्याचे व परस्पर समन्वय राखण्याचे निर्देश पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर अभियंता विभागाला दिले असून याबाबत खबरदारी म्हणून व तात्काळ खड्डे दुरुस्ती करण्यासाठी विभागवार पथके तयार करण्यात आली आहेत.त्यामुळे शहरात खड्डे पडताच तात्काळ ते बुजवण्याबाबतची दक्षता पालिकेकडून घेण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या अभियंता विभागाने दिली आहे.तर ४८ तासात खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास ठेका ठेकेदाराला दंड करण्यात येणार आहे. शहरात २५ जूनपासून पावसाला सुरवात होताच पालिका आयुक्त राजोश नार्वेकर यांनी शहरातील दौरा केला होता. त्यावेळी काही ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत ही कामे त्वरित थांबविण्याचे व सदर रस्ते वाहतूकीसाठी खुले करण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास दिले होते. त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीबाबतही तत्पर कार्यवाहीचे निर्देशित केले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडताच तात्काळ दुरुस्ती केला जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत रहावेत याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने रस्ते दुरुस्तीचे वार्षिक देखभाल – दुरुस्ती ठेका देण्यात आला आहे.त्यांच्यामार्फत रस्ते दुरूस्तीवर विशेष लक्ष दिले जात असून याकरिता विभागनिहाय ८ तसेच एमआयडीसी क्षेत्राकरिता २ अशा एकूण १० कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत नियमितपणे रस्ते पाहणी करून त्याची दुरुस्ती करण्यात येते याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरिक तक्रार निवारण प्रणालीवर तसेच विविध माध्यमांव्दारे प्राप्त होणा-या रस्त्याबाबतच्या तक्रारींवर त्वरित दुरुस्ती कार्यवाही करण्यात येत आहे.
कंत्राटदारांमार्फत ४८ तासात दुरूस्ती कार्यवाही करण्यात न आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पावसाळी कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेने विभागवार रस्ता दुरुस्ती पथके तयार केली असून पावसाळयाच्या अनुषंगाने कोल्ड मिक्सड अस्फाल्टचा रस्ते दुरुस्तीसाठी वापर करण्यात येत आहेत. नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने भरतीच्या कालावधीत अतिवृष्टी असल्यास शहरातील काही सखल भागात पाणी साचून राहते. याबाबत दक्षता बाळगत नवी मुंबई महानगरपालिका जलद पाणी निचरा होण्यासाठी पाणी उपसा पंप व इतर अनुषांगिक व्यवस्था करीत असून सखल भागात पाणी साचून राहिल्याने तेथील रस्त्यांच्या पृष्ठभागाचीही काही प्रमाणात हानी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तथापि या अनुषंगाने नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याबाबत नवी मुंबई महानगरपालिका दक्ष असून पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार दुरुस्तीची कार्यवाही जलद करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती अभियंता विभागाने दिली आहे.
पावसाळी कालावधीत रस्ते सुव्यवस्थित राहण्याबाबत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार अभियंता विभागामार्फत विशेष दक्षता राखणेबाबत आठही विभागांचे कार्यकारी अभियंता व सर्व अभियंतावर्गास तसेच कंत्राटदारांस काटेकोर सूचना देण्यात आली. पावसाळ्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याबाबत खबरदारी बाळगण्यात येत आहे.