मुंबई : मी कुठल्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच असणार आहे, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केली. मनी लाँड्रिग प्रकरणात अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदारांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, अजित पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते. भेटीबाबत पत्रकारांनी विचारले असता राजकीय विषयावर चर्चा केलेली नाही. २५-३० वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. माणुसकी म्हणून, मित्र म्हणून त्यांना भेटायला आलो. ही केवळ सदिच्छा भेट होती. राजकीय भेट नव्हती. दुसरा कुठलाही अर्थ काढू नका. त्यांची प्रकृती सुधारल्या शिवाय दुसरे कुठलेही काम त्यांनी करू नये, असाच आमचा आग्रह आहे असे प्रफुल्ल पटेल त्यावेळी म्हणाले होते. सर्वोच्च न्यायलयाने काही दिवसांपूर्वी मलिक यांना जामीन मंजूर केला होता. सद्या प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन देण्यात आला आहे.
तब्बल दीड वर्षांनंतर नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणामुळे दोन महिन्यांचा जामीन मिळाला आहे. नवाब मलिक यांना किडनीचा आजार आहे. त्यांची किडनी निकामी झाली आहे. या आजारावर उपचारांसाठी जामीनाची मागणी नवाब मलिक यांनी केली होती. ती मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला. नवाब मलिक तूर्तास आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. जामिनानंतर तीन दिवसांनी मलिकांना मुंबईच्या सिटी केअर रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे अनेक तास रूग्णालयाबाहेर त्यांची वाट पहात उपस्थित होत्या. सध्या राष्ट्रवादीचा दोन्हीं गटातील नेत्यांकडून नवाब मलिक यांचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठीं भेटीगाठी तसेच फोनवरून विचारपूस सुरु आहे. नवाब मलिक यांची प्रकृती सद्या ठीक नाही. त्यांचे वजन २५ ते ३० किलोने कमी झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी प्रकृतीची काळजी घेण्यात सांगितले असल्याचे त्यांचे बंधू कप्तान मलिक म्हणाले. दरन्यान मलिकांची कन्या निलोफर मलिक यांनी माझ्या वडिलांसाठी सर्वात प्राधान्याचं काम म्हणजे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रीत करणं असेल. आम्ही त्यांना उत्तम वैद्यकिय सुविधा पुरवू तसेच त्यांना पुन्हा कामासाठी तयार करू अशी खात्री दिली.