रत्नागिरी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या वितरणाबाबत ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. काही काळ विस्कळीत झाल्यानंतर आता वितरकांनी ग्रामीण भागात पुन्हा एकदा घरपोच गॅस सिलिंडर सेवा सुरू केली आहे. मार्च महिन्यात आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतात एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला होता, त्यामुळे वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामीण भागातील नागरिकांना गॅस एजन्सीवर जाऊन सिलिंडर घ्यावा लागत होता आणि त्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत होत्या. मात्र, आता परिस्थिती पूर्ववत होत असून ग्राहकांना पुन्हा थेट घरपोच सिलिंडर मिळणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
घरपोच सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून बुकिंग करणे आवश्यक आहे. बुकिंग केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जातो, जो सिलिंडर डिलिव्हरीच्या वेळी आवश्यक असतो. या ओटीपीच्या आधारेच सिलिंडर ग्राहकांच्या घरी सुपूर्द केला जातो, ज्यामुळे वितरण प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनली आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार सध्या सुमारे ९९ टक्के एलपीजी बुकिंग ओटीपी प्रणालीवर आधारित आहे. या नव्या व्यवस्थेमुळे गैरप्रकारांवर नियंत्रण येण्यास मदत होणार असून ग्राहकांना अधिक सुलभ आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे.







