मुंबई : मुंबईत पावसाने ओढ दिली असली तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. ही वाढ फार मोठी नसली तरी पाणीसाठ्यात अडीच ते तीन हजार दशलक्ष लिटरने वाढ होण्यास मदत होत आहे. जून महिना संपत आला तरी मुंबईत पावसाचा जोर काही वाढलेला नाही. अजूनही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे धरणातील पाण्याचेही मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले होते. एकूणच धरणातील पाणीसाठा कमालीचा आटला होता. आता पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पावसाने फार गती घेतलेली नसली तरी तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव आणि धरणे ही प्रामुख्याने मुंबईबाहेर आहेत. त्या भागात पाऊस चांगला होत आहे. परिणामी, धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. धरणात दररोज अडीच ते साडेतीन हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होत आहे.
२१ ते २४ जून या चार दिवसांत मुंबई शहराला सुमारे १४ हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीपुरवठा करण्यात आला. याचाच अर्थ गेल्या चार दिवसांत १३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाण्यामध्ये वाढ झाली. परंतु, ही वाढ समाधानकारक नसून, तलाव क्षेत्रात पावसाची आवश्यकता आहे, तरच मुंबईकरांवरील पाणीटंचाईचा संकट दूर होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत १४४ ते ३२४ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे आजूबाजूचे ओढे व छोट्या नद्या वाहू लागल्यामुळे हे पाणी तलाव क्षेत्रात जमा होत आहे. त्यामुळे दररोज पाणीसाठ्यात अडीच ते तीन हजार दशलक्ष लिटरने वाढ होत आहे.