मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. बेस्ट बससेवा थेट लोकल आणि मेट्रो स्थानकांना जोडण्यात येणार आहे. स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना कधी कधी कसरत करावी लागते. कधीकधी वेळेवर रिक्षा किंवा बेस्ट बस मिळत नाही. त्यासाठी प्रशासनाने एक सोप्पा उपाय शोधून काढला आहे. बेस्ट बससेवा थेट रेल्वे व मेट्रो स्थानकांना जोडण्यात येणार आहे. अंधेरी, जोगेश्वरी, कुर्ला, वांद्रे, कांदिवली व बोरिवली या स्थानकांपर्यंत पोहोचणे आता सोप्पे होणार आहे. मेट्रो मार्गिका १, २ए, ७ आणि ३ या मेट्रो मार्गिकाही थेट बेस्टने जोडल्या जाणार आहेत. मुंबईतील उपनगरीय स्थानकांत दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अंधेरी, वांद्रे, बोरीवली या स्थानकांतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या स्थानकांना थेट बेस्ट बसशी जोडण्यात आल्यास त्याचा लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे.
बेस्ट फक्त लोकललाच नाही. मुंबईतील प्रमुख मेट्रो मार्गांनाही जोडणार आहेत. यात मेट्रो मार्गिका क्रमांक १,२ए, ७ आणि अॅक्वा लाइन ३ यांचा समावेश आहे. त्यामुळं नागरिकांना आता थेट मेट्रो पकडणेही शक्य होणार आहे. तसंच, यामुळं गर्दीच्यावेळी होणारा त्रासदेखील कमी होणार आहे. बेस्ट उपक्रमाला फायद्यात आणण्यासाठी प्रवाशांकडून मिळणाऱ्या मोबदल्या व्यतिरिक्त उत्पन्न (नॉन- फेअर रेव्हेन्यू) वाढीवर भर देण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्टच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ दिला. एकूण उत्पन्नाच्या 40 टक्के उत्पन्न हे प्रवासी भाडे व्यतिरिक्त असावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. बेस्टची सेवा जोपर्यंत धावत नाही, तोपर्यंत इतर वाहतूक सेवा सक्षम होत नाही. त्यामुळे बेस्टला मजबूत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. प्रवासी भाडे व्यत्तिरिक्त उत्पन्नावर भर देऊन बेस्टला स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे. एकल तिकीट सेवा प्रक्रिया वेगात राबवणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.







