रायगड : रायगड येथे खालापूरमधील इरसाळवाडी गावात झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून घटनेचा आढावा घेतला आहे. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केल्याचे तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च हा राज्य सरकार करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. यावेळी बचावकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर तयार आहेत, मात्र खराब हवामानामुळे टेकऑफ करणं शक्य नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर
दरम्यान, हेलिकॉप्टर तयार असून खराब वातावरणामुळे तिथे ते उतरु किंवा थांबू शकत नाही, त्यामुळे हाताने बचावकार्य करण्याशिवाय पर्याय नाही, असं अजित पवार म्हणाले. यामध्ये संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे व आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये ८० जणांना वाचवण्यात यश आले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. या घटनास्थळी बचावकार्य करण्यासाठी अडचण जरी निर्माण होत असली तरी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याचेही ते म्हणाले. सध्या मंत्री अनिल पाटील, मंत्री अदिती तटकरे यांच्यासह इतर अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
बचावकार्यासाठी ५०० ते ७०० माणसं घटनास्थळी कार्यरत असून युध्द पातळीवर बचावकार्य सुरू असल्याचे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, रायगडमधील प्रशासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टरचा वापर सध्या तरी बचाव कार्यासाठी करता येणार नाही. मात्र बचावकार्यासाठी लागणारं सामान घेऊन जवळपास ५०० ते ७०० माणसं घटनास्थळी पोहोचली असून पुन्हा जास्तीचे मनुष्यबळ पाठवण्यात येणार आहेत. सरकारी यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या भागांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता या भागातील परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचं कळत आहे, असं अजित पवार म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळीच्या खाली आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा अनेक लोक घाबरुन बचावासाठी दुसरीकडे पळून गेल्याने अजून किती लोक दुर्घटनेमध्ये अडकले आहेत हे अद्यापही कळलेलं नाही. तसेच सरकारी यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बेसकॅम्पमध्ये मुख्यमंत्री स्वत: बसून असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.